Tuesday, November 13, 2018

रात्र कशी निर्माण झाली

🔶गोष्टीचे नाव- रात्र कशी निर्माण झाली ?

🔶अनुवादक- डॉ.वृषाली देहाडराय

🔶मूळ स्रोत-डॅनिश कथा

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी हे जग नुकतेच निर्माण झाले होते. या जगामध्ये रात्रच नव्हती.पूर्ण वेळ दिवसच असायचा. कोणीही सूर्योदय किंवा सूर्यास्त, ताऱ्यांचा प्रकाश किंवा चंद्रप्रकाश याबद्दल काहीही ऐकलेले नव्हते. त्या जगात रात्रीचे पक्षी नव्हते, निशाचर प्राणी नव्हते की रात्री फुलणारी फुले नव्हती. संध्याकाळी मोठ्या होत जाणाऱ्या सावल्या नव्हत्या, रात्री मंद वाहणारा वारा नव्हता की रात्रीचा गंध नव्हता.

तेव्हा खोल समुद्रात एका सागरी महासर्प राज्य करत होता. या सागरी महासर्पाच्या मुलीने पृथ्वीवरच्या मानव वंशातील एका तरुणाशी लग्न केले. लग्न झाल्यावर खोल समुद्रातील तिचे घर सोडून ती तिच्या पतीबरोबर सदा सर्वकाळ दिवस आणि प्रखर सूर्यप्रकाश असणाऱ्या भूतलावर रहायला आली.

पण तिला एवढ्या प्रकाशाची सवय नव्हती. जमिनीवरच्या प्रखर प्रकाशाने तिचे डोळे शिणले आणि तिचे सौंदर्य झाकोळू लागले. तिची ही अवस्था बघून तिचा पती अत्यंत दु:खी झाला. तिची ही अवस्था दूर करण्यासाठी काय करावे ते त्याला कळेना. “इथे रात्र होत असती तर किती बरं झालं असतं.” अंथरुणावर तळमळत ती कण्हत म्हणाली. “इथे नेहमीच दिवस असतो. माझ्या वडिलांच्या राज्यात कितीतरी सावली असते. इथे रात्रीचा थोडा तरी अंधार असता तर किती बरं झालं असतं.” तिचा पती तिचं कण्हणं ऐकत होता. “रात्र म्हणजे काय?” त्याने तिला विचारले. “मला सांग म्हणजे मी कदाचित तुझ्याकरता थोडी रात्र आणू शकेन.”

“रात्र.” त्या सागरी महासर्पाची मुलगी म्हणाली, “समुद्राच्या पोटात खोलवर असणाऱ्या माझ्या वडिलांच्या राज्यात ज्या अंधार करणाऱ्या ज्या दाट सावल्या असतात त्याला रात्र म्हणतात. मला तुझ्या पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश आवडतो पण त्यामुळे मी थकून जाते. आपल्या डोळ्यांना थोड्या वेळाकरता आराम मिळावा म्हणून माझ्या बाबांच्या राज्यातून थोडा अंधार आणता आला असता तर किती बरं झालं असतं.” तिच्या पतीने ताबडतोब त्याच्या सर्वात निष्ठावान अशा तीन सेवकांना बोलावलं. “मी आता तुम्हाला एका प्रवासाला धाडणार आहे.” तो म्हणाला. “तुम्ही खोल समुद्रात असलेल्या सागरी महासार्पाच्या राज्यात जा आणि त्यांना सांगा की त्यांची कन्या आपल्या पृथ्वीवरच्या सूर्यप्रकाशाने मरून जाऊ नये म्हणून रात्रीचा थोडा अंधार द्या.”

ते तीन सेवक सागरी महासर्पाच्या राज्यात जाण्यास निघाले. खूप धोक्याचा प्रवास करून ते अनेक दिवसांनी महासर्पाच्या राजवाड्यात पोचले. ते महासर्पाच्या समोर गेले आणि त्याला मुजरा करून उभे राहिले. “महाराज, आपल्या कन्येला पृथ्वीवरच्या प्रखर सूर्याप्रकाशाचा खूप त्रास होतोय. तेव्हा आपल्या राज्यातील रात्रीचा थोडा अंधार आम्हाला पृथ्वीवर नेण्यासाठी देण्याची कृपा करावी.” आपल्या कन्येच्या भल्यासाठी महासर्पाने त्यांची विनंती मान्य केली. त्यांनी त्याला एक गाठोडाभर अंधार दिला. त्या गाठोड्याचे तोंड गच्च बांधलेले होते. महासर्पाने त्यांना बजावून सांगितले की त्यांच्या मालकिणीच्या म्हणजे त्याच्या मुलीच्या समोर पोचल्याशिवाय ते गाठोडे अजिबात उघडायचे नाही. महासर्पाच्या राज्यातून त्या तीन सेवकांनी आपला परतीचा प्रवास सुरू केला.

त्यांच्या डोक्यावर रात्रीने भरलेले मोठे गाठोडे होते. काही काळाने त्यांना त्या गाठोड्यातून चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. ते आवाज निशाचर प्राणी, रात्री उडणारे पक्षी आणि रातकिड्यांचे होते.

तुम्ही कधी नदीच्या काठावरच्या जंगलातले आवाज रात्रीच्या वेळी ऐकले असतील तर तुम्हाला त्या गाठोड्यातून कसले आवाज येत असतील ते समजलं असेल. त्या तीन सेवकांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यात असे आवाज पूर्वी कधीच ऐकले नव्हते. ते आवाज ऐकून ते सेवक भीतीने अगदी अर्धमेले झाले. “हे बघा, माझं ऐका. हे रात्रीने भरलेलं गाठोडं आपण इथेच टाकून देऊ या आणि इथून पळ काढूया.” एक सेवक म्हणाला. “काहीही केले तरी आपण मरणारच आहोत.” दुसरा सेवक भीतीने थरथर कापत म्हणाला. “आपण वाचू किंवा मरू. पण मी हे गाठोडे आता इथेच उघडणार आहे. हे भयानक आवाज कोण करताय ते मला बघायचाच आहे.”असं बोलून त्यांनी मग ते गाठोडे जमिनीवर ठेवले आणि उघडले. गाठोडे उघडता क्षणी ते निशाचर प्राणी, पक्षी, रातकिडे घोंगावत बाहेर आले आणि त्याचबरोबर बाहेर आला रात्रीचा एक मोठा काळा ढग. महासर्पाची राजकन्या डोळ्यात प्राण आणून रात्रीच्या अंधाराचे गाठोडे घेऊन येणाऱ्या सेवकांची वाट बघत होती. जेव्हापासून ते प्रवासाला गेले होते तेव्हापासून ती डोळ्यांवर हात ठेवून ती दूरवर क्षितिजाकडे नजर लावून मोठ्या आशेने बघत होती. कधी एकदा ते सेवक अंधार घेऊन येताहेत असे तिला झालं होतं. ज्यावेळी त्या तीन सेवकांनी गाठोडं उघडल्यावर रात्रीने पळ काढला त्यावेळी ती तशीच डोळ्यांवर हात ठेवून ती राजवाड्याच्या बागेतल्या खजुरीच्या झाडाखाली उभी होती.

“रात्र आली, अखेर रात्र आली.” जेव्हा तिला क्षितिजावर रात्रीचा अंधार दिसला तेव्हा ती आनंदाने ओरडली. मग तिने समाधानाने डोळे मिटले आणि त्या खजुरीच्या झाडाखाली झोपी गेली. झोपेतून उठल्यावर तिला अतिशय प्रसन्न वाटले. आता ती खोल समुद्रातल्या वडिलांच्या राज्यातून पृथ्वीतलावर जेव्हा ती रहायला आली तेव्हा जशी दिसत होती तशीच सुंदर आणि आनंदी दिसायला लागली. शांत झोप झाल्याने ती पुन्हा एकदा दिवसाच्या सूर्याप्रकाशाचा सामना करायला सिद्ध होती. खजुरीच्या झाड्याच्या माथ्यावर चमकणाऱ्या ताऱ्याकडे पाहून ती म्हणाली, “हे तेजस्वी ताऱ्या, तू आजपासून पहाटेचा तारा म्हणून ओळखला जाशील आणि तुला दिवसाचा दूत मानले जाईल. या प्रहरी या आकाशावर तुझे राज्य असेल.” तिने सर्व पक्ष्यांना आपल्याकडे बोलावले आणि म्हटले, “मधुर गीत गाणाऱ्या हे पक्ष्यांनो, मी तुम्हाला आज्ञा देते की आजपासून तुम्ही या वेळी तुमची मधुर गाणी गाऊन दिवसाच्या आगमनाची वर्दी द्या.” तिच्या शेजारी एक कोंबडा उभा होता. ती त्याला म्हणाली, “रात्रीचा रखवालदार म्हणून मी तुझी आजपासून नेमणूक करते. तुझे आरवण्याने रात्रीची गाज राहील आणि इतरांना समजेल की मादृगडा येते आहे.” अगदी आजपर्यंत ब्राझीलमध्ये पहाटेला मादृगडा म्हटले जाते. कोंबडा पहाट व्हायला आली की तिची वाट पाहणाऱ्या पक्ष्यांना इशारा देतो. त्यावेळी पक्षी सुश्राव्य गाणी म्हणतात आणि पहाटतारा मादृगडाचा राजा म्हणून आकाशावर राज्य करतो. अशा तऱ्हेने पृथ्वीतलावर रात्र व्हायला लागली.

मात्र आवाजांना घाबरून सेवकांनी महासर्पाची आज्ञा भंग केली. त्यांनी ते गाठोडे त्यांच्या मालकिणीच्या समोर उघडले नाही त्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्या तीन सेवकांचे माकडात रुपांतर झाले. गाठोड्याला लावलेले मेणाचे सील त्यांनी तोंडाने तोडले होते. त्याची खूण म्हणून त्यांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर कायमचा व्रण आला. हा व्रण आजही आजही माकडांच्या ओठांवर बघायला मिळते. जगाच्या सुरुवातीला गाठोड्यातून रात्रीने जशी एकदम बाहेर उडी मारली तशी अजूनही ब्राझीलमध्ये एकदम रात्र होते आणि रात्र झाल्यावर सगळे निशाचर प्राणी, पक्षी आणि रातकिडे सूर्यास्त समूहगान करू लागतात.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

No comments:

Post a Comment